यंदा गणपती पावणे दोनच्या आतच घरी आणा; जाणून घ्या सविस्तर…..

मित्रानो, प्रत्येक भक्ताला वर्षभर गणरायाच्या आगमनाची आतुरता असते. गणेश चतुर्थीचा शुभ दिवस आता अगदी जवळ आला आहे. गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाची सुरुवात होते. हा भारतातील सर्वांत लोकप्रिय हिंदू सणांपैकी एक सण आहे. त्याला विनायक चतुर्थी म्हणूनही ओळखले जाते. गणपती हा भगवान शिव आणि देवी पार्वती यांचा पुत्र आहे. हिंदू धर्मात श्रीगणेशाला आराध्यदैवत मानले जाते. गणपती म्हणजे बुद्धी-समृद्धी-सौभाग्याची देवता, सुखकर्ता, विघ्नहर्ता, १४ विद्या व ६४ कलांचा अधिपती, असे मानले जाते. कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही गणेशाच्या पूजनानंतरच होते.

तसेच भक्तांची सर्व विघ्ने तो दूर करतो, अशी श्रद्धा असल्यामुळे त्याला विघ्नहर्ताही म्हणतात. गणेश चतुर्थी सहसा ऑगस्ट ते सप्टेंबरदरम्यान भाद्रपद या हिंदू महिन्यात येते. देशभरात विशेषत: महाराष्ट्र, गुजरात, ओडिसा, उत्तर प्रदेश व कर्नाटकमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.

या दिवशी गणेशाचा जन्म झाला, असे मानले जाते. गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी असा हा १० दिवसांचा गणेशोत्सव अत्यंत मनोभावे, उत्साहाने व आनंदात साजरा होतो.

पौराणिक मान्यतेनुसार, ज्या दिवशी महादेव शंकर आणि माता पार्वतीचा मुलगा गणेश जन्माला येतात, तो दिवस म्हणजे भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी होती. म्हणून या दिवसाला गणेश चतुर्थी आणि विनायक चतुर्थी म्हणून ओळखले जाते. श्रीगणेशाच्या पूजेमुळे घरात सुख, समृद्धी आणि भरभराट होते, असे मानले जाते. कोणत्याही शुभकार्यात विघ्न येऊ नये म्हणून गणेशाची आराधना करतात.

उत्सवाच्या सुरुवातीला घरात सुंदर सजावट केली जाते. गणेशमूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. उपासना करण्याच्या १६ पद्धती आहेत. मूर्तीला लाल चंदन लावले जाते आणि पिवळ्या व लाल फुलांनी सजवले जाते. गणरायाला जास्वंदाचे फूल आणि दूर्वा अत्यंत प्रिय आहेत, त्या अर्पण केल्या जातात. तसेच गणेश उपनिषद आणि इतर वैदिक स्तोत्रांचा उच्चार केला जातो.

त्याशिवाय नारळ, गूळ आणि २१ मोदकांचा नैवेद्य दाखवला जातो. मोदक हा गणेश यांचा आवडता पदार्थ मानला जातो. उत्सवाच्या शेवटी ढोल वाजवून, भक्तीने गायन आणि नृत्यासह मूर्तींच्या मोठ्या मिरवणुका जवळच्या नदीकडे नेल्या जातात. विधीचा एक भाग म्हणून मूर्तींचे विसर्जन केले जाते. गणेश आपले आई-वडील म्हणजेच शिव आणि पार्वतीचे घर असलेल्या कैलास पर्वतावर परत जातात, असे मानले जाते.

पंचांगानुसार(हिंदू पंचागानुसार) २०२३ मध्ये गणेश चतुर्थी सोमवार, १८ सप्टेंबर रोजी दुपारी १२.३९ वाजता सुरू होईल आणि मंगळवार, १९ सप्टेंबर २०२३ रोजी रात्री २०.४३ वाजता समाप्त होईल.

चतुर्थी तिथी सुरुवात ही दुपारी १२.३९ वाजता १८ सप्टेंबर २०२३ ला सुरू होणार आहे आणि चतुर्थी तिथी समाप्त ही दुपारी १.४३ वाजता १९ सप्टेंबर पर्यंत असणार आहे. या कालावधीत आपणाला आपल्या बाप्पांचे आगमन आपल्या घरामध्ये करायचे आहे.

Leave a Comment